१०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत चोपडा शहर .. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्ताने शांतता ठेवण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डींचे आवाहन
चोपडा दि.२५(प्रतिनिधी):-कुठल्याही प्रकारच्या समाजात तेढ निर्माण होणार नाही अन््कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावयाची आहे.जे कार्यकर्ते बेफाम होऊन शांततेत बाधा बनू पाहत असतील अशांवर कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा देत शहरभर मिरवणूकीच्या मार्गावर १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर प्रत्येकावर असून कोणीही आताताईपणा करू नये.व गणपती बाप्पा ला शांततेत निरोप द्यावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.गेल्या बऱ्याच काळापासून चोपडा हे शांतताप्रिय शहर असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
चोपडा शहर पोलीस स्टेशनने नगरपालिका नाट्यगृहात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद 2025 निमित्ताच्या आयोजित केलेल्या शांतता समिती बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, ,चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश टाक, मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्यासह चोपडा शहरातील हिंदू व मुस्लिम बांधवांसह सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष , काही राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, पोलिस अधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.