मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांचे शांततेचे आवाहन..

  

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांचे शांततेचे आवाहन..

चोपडादि.९ (प्रतिनिधी):-* महाराष्ट्रातील आदिवासी कोळी लोकांना सुलभतेने जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ६ ऑगस्ट रोजी मुंबईत मलबार हिलस्थित सह्याद्री अतिथी गृहावर राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आलेली होती. याआधी हि बैठक २८ जून, ८ जुलै व ५ ऑगस्ट अशा तीन वेळेस काही कारणास्तव रद्द करण्यात आलेली होती. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री, पालकमंत्री, आदिवासी आमदार-खासदार, आदिवासी आयुक्त- सचिव यांचेसह आदिवासी कोळी जमातीचे प्रमुख पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. परंतु इतरही आदिवासींच्या संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी हजर राहिल्याने बैठकीच्या सुरुवातीलाच गोंधळाला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कडक सूचना दिल्यानंतरही वादविवाद वाढल्याने राजव्यापी महाआंदोलन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी बैठक शांततेने व्हावी याबाबत सर्वजमातबांधवांना कळकळीचे आवाहन केले. "कारण प्रथमच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कोळी जमातीची बैठक होत असताना वाद करणे चुकीचे आहे, आपण एकच आहोत. एका कागदाच्या तुकड्यासाठी आपल्या भावी पिढ्या बरबाद होत आहेत, म्हणून सर्वांनी शांतता ठेवावी", असे आवाहन जगन्नाथ बाविस्करांनी करताच पूर्ण सभागृहात शांततेचे वातावरण पसरलेले होते. 

         परंतु विधान परिषदेचे उपसभापती नरहरी झिरवळ, आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते लकी जाधव, टी आर टी आय चे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी कोळीजमात विरोधी भूमिका घेतल्याने पुन्हा वादाचे वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली. कोळी जमातीच्या अभ्यासकांनी आपली भूमिका मांडताच इतर आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी मुद्दामहून विरोध करीत होते. त्यांनी हि बैठक पूर्णपणे उधळून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेत. पर्यायाने मुख्यमंत्र्यांनी बैठक आटोपती घेताना जगन्नाथ बाविस्कर यांच्याकडे अंगुलीनिर्देश करून सांगितले की, "आपण सर्वांना सामंजस्याने शांततेत बैठक झाली पाहिजे असे सांगितले, परंतु इतरांनी वादविरोध केल्यामुळे आजची बैठक स्थगित करून लवकरच मर्यादित कोळी लोकांसोबत बैठक घेण्यात येईल", असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीस दोन्ही उपमुख्यमंत्री व आदिवासी मंत्री अनुपस्थित राहिल्याने कोळी बांधवांमध्ये नाराजी पसरलेली होती. याप्रसंगी जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातुन आलेल्या कोळी जमातबांधवांसह इतरही आदिवासी संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने