वसुंधरेचे संवर्धन सर्वांचे कर्तव्य : पोलीस निरीक्षक के.के. पाटील
चोपडा दि.01(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक वन दिन, जागतिक जल दिन आणि जागतिक हवामान दिन या निमित्ताने उद्बोधन कार्यक्रम व वसुंधरा पोस्टर प्रदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, उद्घाटक म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. के. के. पाटील, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, ॲड. संदेश जैन, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, प्रा. डॉ. के एन. सोनवणे, प्रा. डॉ. पी. एस. लोहार, भूगोल विभाग प्रमुख डॉ. शैलेश वाघ उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वसुंधरा पूजन, जलपूजन व वृक्ष पूजन करून कार्यक्रमाचे व पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उपक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य एन. एस. कोल्हे यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धन विषयक विविध कृती कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्याचे कौतुक करून असे उपक्रम राबविणे व त्याच्यात सहभागी होणे हे केवळ त्यांचे कर्तव्य नसून पर्यावरण संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण पूरक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन या वसुंधरेचे रक्षण करणे काळाची गरज आहे. पृथ्वीवरील जल, वन व पर्यावरण यांचे संवर्धन न केल्यास भविष्यात हानिकारक दुष्परिणाम जीवसृष्टीला भोगावे लागतील. महाविद्यालयाच्या परिसरात, आपल्या गावात आपण असे उपक्रम राबवून समाज जागृती करावी असे आवाहन देखील त्यांनी केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ॲड. संदीप सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना जल, जंगल, जमीन यांच्या संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन केले. तसेच भूगोलशास्त्र विभागाचे अशा पर्यावरण पूरक उपक्रमाबद्दल कौतुक देखील केले. पोस्टर प्रदर्शनात पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मान्यवरांसमोर सादरीकरण केले. वसुंधरा पोस्टर प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्रियंका कोळी, द्वितीय क्रमांक हर्षदिव्या सोनवणे, तृतीय क्रमांक तेजल पाटील, चतुर्थ क्रमांक अश्विनी बाविस्कर तर पाचवा क्रमांक मिती बारेला या विद्यार्थिनींनी प्राप्त केला. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वसुंधरा पोस्टर प्रदर्शनाला महाविद्यालयातील अध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे आभार मोतीराम पावरा यांनी मानले. भूगोलशास्त्र विभागातील प्रा. मुकेश पाटील, डॉ. संगीता पाटील, प्रा. डी. पी. सोनवणे यांनी जल, वन आणि हवामान बदल या विषयांवर विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष खैरनार, राजू निकम व विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रसंगी प्रा. माया शिंदे, प्रा. पी. एस. पाडवी, प्रा. संदीप पाटील, डॉ आर आर पाटील, प्रा. अनिता सांगोरे यांच्यासह अनेक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.