*एस.टी.कर्मचारी संपाला कोळी समाजाचा जाहिर पाठिंबा..*
*चोपडा दि.२१(प्रतिनिधी)* सध्या राज्यभर सुरू असलेल्या एस.टी.कर्मचारी संपाला चोपडा तालुका महर्षी वाल्मिकी कोळी समाज मंडळाने पाठिंबा जाहीर केला आहे.एस.टी. महामंडळाचे खाजगीकरण ऐवजी सरकारीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एस.टी. कर्मचारी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून संपावर उतरले आहेत.एस.टी.कर्मचारी हा आपल्या प्रत्येक समाजातील व परिवारातील एक सदस्य आहे,असे समजून तालुक्यातील जनतेने एस.टी. कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपाला पाठिंबा दिला पाहिजे.या पार्श्वभूमीवर प्रथमच चोपडा तालुक्यातील कोळी समाजाने संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. अशी माहिती चोपडा म.वाल्मिकी कोळी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.
एस.टी.तोट्यात दाखवून जनतेच्या पैशातून मिळालेल्या सार्वजनिक मालमत्तेचे खासगीकरण करून जनतेची गैरसोय करू पाहणाऱ्या शासन व प्रशासनाला वेळीच विरोध झाला पाहिजे.एस.टी. महामंडळ हा शासनाचाच एक भाग असून त्याचे खाजगीकरण करणे हा सुद्धा तुघलकी निर्णय ठरणार आहे. एस.टी.चे सरकारीकरण झाले तर महामंडळातील भ्रष्टाचार थांबेल,राज्यात एस.टी.च्या माध्यमातून दळणवळणाला बळकटी येणार आहे.प्रवासी जनतेला मिळणाऱ्या सेवा सवलती टिकून राहतील.तिकिट दरात मोठी कपात होईल.त्यामुळे एस.टी.महामंडळाच्या माध्यमातून शासनाची आर्थिक बाजु भक्कम होईल.परंतु एस.टी.चे खाजगीकरण झाल्यास एस.टी.चा प्रवास महाग होईल.ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी,पत्रकार,अंध,अपंग व दैनिक प्रवासी यांना कोणतीच सवलत मिळणार नाही.प्रवासी भाडे जास्तीचे आकारून जनतेची लूट होईल.हे थांबवण्यासाठी एस.टी.चे सरकारीकरण होणे गरजेचे आहे.यासाठी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला सामान्य जनता व प्रवाशांनी पाठिंबा द्यावा,असेही आवाहन सामा.कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर(गोरगांवले बु.) यांनी केले आहे.
*.....................................*
*संपकरी कर्मचाऱ्यांना धाकदपटशा करून निलंबित करणे,आगारातून बाहेर काढणे,पिण्याचे पाणी,सार्वजनिक मुतारी, शौचालय वापरास बंदी करणे असा त्रास दिला जात आहे. ज्या खाजगी प्रवासी वाहनांना आगाराच्या आजूबाजूला थांबू दिले जात नव्हते,आज त्या वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी आगारात जागा दिली जात आहे.संपकर्यांच्या समस्या जाणुन घ्यायला भाजप व्यतिरिक्त इतर कोणीही पोहोचलेले नाही.ही खेदाची व माणुसकी शुन्य बाब आहे.*