बांगलादेशांतील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात भडगाव येथे ठिय्या आंदोलन
भडगाव दि.१०:- (प्रा. सुरेश कोळी )बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर अंतरिम सरकारचे पंतप्रधान मुहम्मद युनूस यांनी हिंदू आणि गैर-मुस्लिमांवर कहर सुरू केला आहे. जमात-ए-इस्लामीसारख्या कट्टरवादी संघटनांवरील बंदी हटवून कट्टरवाद्यांना मुक्त हात दिल्यानंतर बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत.
गेल्या २ महिन्यांपासून हिंदू मंदिरे आणि वस्त्या जळून खाक झाल्या आहेत. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना घेरून मारले जात आहे. दरम्यान, बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात १०डिसेंबर रोजी सकाळी १० वा. भडगाव येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने भडगाव तहसिल कार्यालय प्रांगणात ठिय्या आंदोलन करुन दुपारी ( 1 वा.) तहसीलदार शीतल सोलाट यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी डॉक्टर निलेश पाटील यांनी आंदोलकांची भूमिका तहसीलदार यांच्यासमोर मांडली.
समस्त हिंदू समाजाच्या वतीने आज दी 10 रोजी तहसिल कार्यालय प्रांगणात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर व तालुका भरातून अनेक लोक सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पुरुष, महिलांचा सहभाग दिसून आला. ढाका पोलिसांनी खोट्या प्रकरणात अटक केलेल्या चिन्मय कृष्ण दास प्रभूच्या सुटकेची मागणी हिंदूंनी लावून धरली आहे. हिंदूंवर होत असलेल्या जघन्य अपराधांचा आणि क्रौर्याचा निषेध यावेळी करण्यात आला.
बांगलादेशातील मुहम्मद युनूस यांचे सरकार गैर-मुस्लिम, विशेषत हिंदूंना संरक्षण देत नाही. त्यांनी न्यायाची मागणी करणाऱ्या चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्यावर देशद्रोहाचा खोटा खटला चालवला आहे. आमची मंदिरे जाळली जात आहेत. आपल्या दैवतांच्या मूर्ती तोडल्या जात आहेत. हिंदूंना वेठीस धरले जात आहे, महिलांची इज्जत लुटली जात आहे, हिंदूंचे राजीनामे जबरदस्तीने घेतले जात आहेत. भारतात घुसलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांनाही हुसकावून लावावे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. युनूस सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची हमी द्यावी, आम्ही भारत सरकारकडे हीच मागणी करतो तसेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग ही या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आज राष्ट्रीय मानव अधिकार आयोग दिवस असल्याने याबाबत आंदोलकांनी खंत व्यक्त केली.
यावेळी डॉ निलेश पाटील, डॉ प्रफुल्ल पाटील, सोमनाथ पाटिल, शाम मुसंडे, नाना हडपे, ऍड निलेश तिवारी, ऍड हेमंत कुलकर्णी, सचिन चोरडिया, प्रा देवेंद्र मस्की, प्रा सुरेश कोळी, रवींद्र पाटील, शिवदास आप्पा महाजन,नरेंद्र पाटील नितिन महाजन, सतीश वाजपेयी, पिनुभाऊ महाजन, सागर महाजन, मुन्ना परदेशी, अजय चौधरी यांच्या विविध व्यापारी प्रतिष्ठान, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व हजारो सकल हिंदू बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
