छत्रपती संभाजीनगर येथे आदिवासी कोळी समाज राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन..

 छत्रपती संभाजीनगर येथे आदिवासी कोळी समाज राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन..

चोपडा,दि.२७ (प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीला 'कोळी किंवा हिंदू कोळी' अशा नोंदी असल्या तरी अर्जदार "कोळी महादेव, कोळी मल्हार, डोंगर कोळी, कोळी ढोर व टोकरे कोळी" यापैकी ज्या जमातीचा दावा करतील, त्यांना त्या अनुसूचित जमातीची (एस.टी. ची) जातप्रमाणपत्रे व वैधता प्रमाणपत्रे मिळालेच पाहिजेत, यासाठी जळगावसह इतरही जिल्हावार आंदोलने, उपोषणे झालीत. परंतू शासनाने गेल्या हिवाळी अधिवेशनात यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणून महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातींनी पुन्हा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन व उपोषणाबाबत विचार विनिमय करण्यासाठी शनिवार, दि. ६ जानेवारी २०२४ रोजी स. १०.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील भारतरत्न डॉ.मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात राज्यस्तरीय एक दिवसीय महाबैठकीचे चहापाणी, नाश्ता, भोजनसह आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती या महाबैठकीचे आयोजक, "एक होता वाल्या" चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक व आदिवासी कोळी समाज समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक अॕड. शरदचंद्र जाधव  यांनी ह्या पत्रकांन्वये दिलेली आहे.

     याआधी जळगावसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी कोळी समाजातर्फे उग्र आंदोलने, उपोषणे सुरू होती व आहेत. परंतु शासन-प्रशासनाने अजुनही दखल घेतलेली नाही. म्हणूनच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकाच दिवशी, एकाच तारखेला व एकाच वेळेस बेमुदत राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा मानस केलेला आहे. याठिकाणी आदिवासी कोळी समाजाच्या सर्व संस्था संघटनांचे नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आजी-माजी अधिकारी कर्मचारी, माताभगिनी, समाजबांधव अपेक्षित आहेत. याप्रसंगी आंदोलनाची सुत्रबध्द रूपरेषा व दिशा, प्रमुख सर्वंकष मागण्या, नेतृत्व, राज्यस्तरीय समिती गठीत करण्यासाठी आपण सर्वांनी या महाबैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी केलेले आहे.

*......................................................*

*राज्यस्तरीय आंदोलनासाठी उपोषणकर्त्यांनी पुढाकार घ्यावा..*

 याआधी अमळनेर येथे जगन्नाथ बाविस्कर यांनी तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करून कोळी समाजाला शेकडों दाखले मिळून दिलेले आहेत. तद्नंतर चोपडा व जळगाव येथेही अशाचप्रकारे आंदोलन उपोषण झाले. परंतु राजकीय व प्रशासकीय दबावापोटी संबंधित अधिकाऱ्यांनी तसे दाखले देणे बंद केलेले आहे. म्हणूनच यापुढील काळात राज्यस्तरीय महाआंदोलन उभारण्यात येणार असून त्यात प्रत्येक जिल्ह्यातील उपोषणकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे..

     *-- सखाराम बिऱ्हाडे, प्रभारी अध्यक्ष,* 

      आदिवासी कोळी समाज समन्वय समिती.

*......................................................*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने