"संविधाननिष्ठ नेतृत्व देशाला आवश्यक" ..डॉ. श्रीकांत येळेगावकर
अंबाजोगाई दि.०२ (प्रतिनिधी) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करिता असताना देशाला संविधाननिष्ठ नेतृत्वाची आवश्यकता आहे, संविधानाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार देश उभारणीचे प्रभावीपणे कार्य झाले पाहिजे असे प्रतिपादन सोलापूर येथील विचारवंत डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले . येथील श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कर्मचारी गणेश व्याख्यान मालेत पहिले पुष्प गुंफताना डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर आपली भूमिका मांडली.
अनेक स्वातंत्र्यविरांच्या बलीदानातून स्वातंत्र्याची प्राप्ती झाली. या पंचाहत्तर वर्षाच्या काळात वेगवेगळ्या पंतप्रधानांनी देशाच्या विकासाची स्वप्ने पाहिली व ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले हे विसरून चालणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
पं नेहरुंनी भारताच्या विकासाचा पाया घातला, लोकशाही, समाजवाद रुजविण्याचा प्रयत्न केला. लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांनी कणखर धोरणाचा जगाला परिचय करून दिला तर राजीव गांधी यांनी वेगवेगळे करार करून देशात शांतता व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला असे मत त्यांनी व्यक्त केले. नरसिंहराव यांनी नवीन आर्थिक धोरण स्वीकारून देशाच्या आर्थिक विकासाची दारे खुली केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर विषयीचे 370 कलम रद्द करुन जम्मु काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहात आणले असे प्रतिपादन डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. भारतीय लोकशाही मजबूत असली तरी देशातील आरोग्य, शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे. विचारांची पुजा झाली पाहिजे, विचार स्वातंत्र्य टिकले पाहिजे तरच देश बलशाली होईल असे प्रतिपादन डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश खुरसाळे यांनी भुषविले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. भिमाशंकर शेटे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. शैलजा बरुरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सविता बुरांडे यांनी केले , आभारप्रदर्शन डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.
या सात दिवसाच्या व्याख्यान मालेच्या पहिल्या कार्यक्रमास योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव कऱ्हाड, जेष्ठ सल्लागार अॅड. व्हि. के. चौसाळकर, कोषाध्यक्ष प्रा. माणिकराव लोमटे, सहसचिव डॉ. साहेबराव गाठाळ, प्रा. एस.के.जोगदंड , कार्यकारिणीचे सदस्य , पत्रकार,स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. थारकर, प्राचार्य डॉ आर. डी. जोशी, प्राचार्य रमण देशपांडे, योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, श्रीमती गो. कुं. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्राध्यापकवृंद, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
