*उष्माघाताचा पहिला बळी.. कष्टाळू शेतकरी मांडळचे.. रखरखत्या उन्हापासून सावध राहा..!*
अमळनेर (प्रतिनिधी ) दिवसभर उन्हात काम केल्याने कष्टाळू तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मांडळ येथे घडली. हा तरुण वाढत्या तापमानाचा पहिला बळी ठरल्याने खळबळ उडाली आहे. तर मेंदूत रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील तरुण जितेंद्र संजय माळी (वय ३३) हा २८ रोजी सकाळी खेड्यांवर व मांडळ गावात खमण विक्री करून आल्यानंतर दुपारी बारा वाजेपासून तो स्वतःच्या शेतात मका काढण्यासाठी गेला होता. भर उन्हात दिवसभर काम केल्याने संध्याकाळी त्याला शेतातच चक्कर आले. त्याचा चुलत भाऊ महेंद्र काशिनाथ माळी यांच्यासह शेतातील काम करणाऱ्यांनी त्याला डॉ. सुनील चोरडिया यांच्याकडे दाखल केले. त्यांनी प्रथमोपचार करून ऊन लागले आहे म्हणून अमळनेरला घेऊन जा, असे सांगितले. त्याला अमळनेर घेऊन जात असताना तो रस्त्यात बेशुद्ध पडला. ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉ आशिष पाटील यांनी त्याचे शवविच्छेदन केले. त्याला मेंदूत रक्तस्राव झालेला होता असे डॉक्टर आशिष पाटील यांनी सांगितले. महेंद्र माळी यांनी मारवड पोलीस स्टेशनला शेतात काम करताना ऊन लागल्याने जितेंद्रचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.
उष्णतेची लाट, नागरिकांनी घ्यावी काळजी
मार्च महिन्याचे शेवटचे चार दिवस उष्णतेची लाट असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर मंगळवारी ही खूपच उन्हाचा तडाखा होता. त्यामुळे जितेंद्र माळी हा उष्माघाताचाच बळी मानला जात आहे. म्हणून नागरिकांनी आवश्यक असल्यास उन्हात बाहेर पडावे. तसेच आवश्यक उपाययोजनांसह उन्हापासून काळजी घ्यावी, असे आवाहन ‘झटपट पोलखोल न्यूज चॅनल टीम’ तर्फे जणहितार्थ करण्यात आले आहे.