आठवडा रेड अलर्टवर ..! उष्माघातने चार वृद्धांचा मृत्यू ! जळगाव जिल्ह्यात १४४ कलम जारी ;घरा बाहेर पडतांना नागरिकांनो जरा जपून..

 आठवडा रेड अलर्टवर ..! उष्माघातने चार वृद्धांचा मृत्यू ! जळगाव जिल्ह्यात १४४ कलम जारी ;घरा बाहेर पडतांना नागरिकांनो जरा जपून..

चोपडा दि.२६(प्रतिनिधी) अडावद येथे मागील दोन दिवसात चार वृद्धांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. उष्माघातामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. अडावद येथे २४ व २५ मे दरम्यान लीलाबाई शांताराम मगरे (वय ७५), अरुणराव रामराव देशमुख (वय ८४), गं.भा. पद्माबाई रामचंद्र जोशी (वय ८५) व गं. भा. शेवंताबाई राघो महाजन (वय ७६) या चौघांचा यांचा मृत्यू झाला आहे. यंदाचे ४७ अंशापर्यंत गेलेले तापमान आजपर्यत आम्ही पाहिलेले अन् अनुभवलेले नसल्याचेही जूने जाणकार व्यक्ति सांगत आहेत. तर शासनाने उष्म्यापासून वृध्दांना वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ही नागरिकांकडून केली जात आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश !

जळगाव जिल्ह्याचे तापमान ४३ ते ४७ अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. नागरीक, कामगार, विद्याथ्यांना त्रास होऊ नये म्हणून कामाच्या व क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे जिल्हाधिका-यांनी सूचित केले आहे. किंबहुना, त्यांनी २५ मेपासून ते ३ जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. कामाच्या ठिकाणी कामगारांना पुरेसे शेड तयार करणे, कुलर किंवा इतर साधने पुरवण्याची जबाबदारी संबंधित प्रतिष्ठान, कंपनी मालकांची राहिल. खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी ० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे. त्यानंतरही क्लासेस सुरू ठेवायचे असतील तर पुरेसे पंखे, कुलरची व्यवस्था करावी असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने