'विद्यापीठाने शुल्क वाढीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा अभाविप तर्फे तीव्र स्वरूपात आंदोलन ' - अभाविप शहरमंत्री हंसराज चौधरी
शिरपूर दि.२८( प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या ७४ वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात एक विधायक शक्ती म्हणून कार्य करीत आहे. अभाविप नेहमीच विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत असते.
उत्तर महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या लाखो सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्रोत म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची ओळख आहे.
आपले विद्यापीठ परिक्षेत्र हे जनजाती बहुल क्षेत्रात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जनजाती बंधू आपल्या विद्यापीठातून शिक्षण घेत असतात.
कोरोनातून आपण कसेतरी सावरत असतांना अश्यातच विद्यापीठामार्फत सुमारे 40% ते 73% पर्यंत शुल्क वाढ करण्यात आलेली आहे. या शुल्क वाढीचा फटका या भागातील गरीब विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या मुलांना बसणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्क वाढ करणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
या अन्यायकारक शुल्क वाढीचा फटका गरीब, शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही अन्यायकारक शुल्कवाढ तातडीने कमी करावी व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, असे निवेदन आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिरपूर शाखेतर्फे एच. आर. पटेल सिनिअर कॉलेजच्या प्राचार्यांना करण्यात आले.
याच महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी परिषद तर्फे निदर्शन करून विद्यापीठाने शुल्क वाढीच्या निर्णयाचा विरोध केला.
यावेळी अभाविपचे नयन माळी शिरपूर शहरमंत्री हंसराज चौधरी, सहमंत्री पार्थ राजपूत, पुष्पक जैन,मीनल पाटील, संकेत पाटील, मोनाली वाघ, सागर भामरे, व विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.