*अमळनेरला नव्याने दगडी दरवाजाच्या बुरुजावर मांगीर बाबांची मूर्ती कोरण्यास मुख्याधिकारी व नगराध्यक्षांची टाळाटाळ.. मागासलेल्या समाजाची अस्मिता पुसण्याचा दु:साहस केल्यास काम बंद पाडू.. बहुजन रयत परिषदेचे सुरेश कांबळेंचा सज़्जड इशारा*
अमळनेर दि.१२(प्रतिनिधी) : शहरातील प्रख्यात दगडी दरवाजा चे बांधकाम नव्याने पूर्णत्वास येत असून बुरुजावर मातंग समाजाचे आराध्य दैवत मांगीर बाबांची मूर्ती कोरण्यास मुख्याधिकारी व नगराध्यक्ष टाळाटाळ करीत असल्याने मागास समाजाची गळचेपी करू पाहत आहेत. असले जातीयवादाचे वलय निर्माण करू पाहणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावू व काम त्वरित बंद करू असा इशारा बहुजन रयत परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी प्रशासनाला दिला आहे.बुरूजावर पुरातन काळापासून मांगीर बाबांच्या मूर्तीचे कोरीव काम होते मग आताच यांना मिरची झोंबायचे कारणं काय ?असा तिखट सवाल करुन "जैसे थे"परिस्थिती आम्हास हवी आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचे संकेत सर्व समाज बांधवांकडून देण्यात आले आहे
त्यांनी पुढे आहे की,दगडी दरवाजा काही वर्षांपूर्वी कोसळला होता. त्या एका बुरुज वर मातंग समाजाची आस्था असलेले मांगीर बाबा यांची मूर्ती होती. मात्र तो भाग त्या वेळेस कोसळला नव्हता. देखभाल दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाकडील राज्य संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळून त्याला अमळनेर नगर परिषदेच्या अखत्यारीत द्यावे अशी मागणी तत्कालीन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व त्यांचे पती साहेबराव यांनी केली होती. व त्यानुसार दगडी दरवाजा हा देखभाल दुरुस्तीसाठी अमळनेर नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात आला आहे. पूजा अर्चा करून या दरवाज्याचे काम सुरू झाले होते. नंतरच्या काळात अनेक अडथळे यात आले. मात्र ते सर्व दूर होऊन कामास सुरुवात झाली. मातंग समाजाचे आराध्य दैवत मांगीर बाबा यांच्या मूर्तीची स्थापना व्हावी म्हणून मूर्तीला तयार करण्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी रोख रक्कम देखील दिली होती. मात्र आता दगडी दरवाज्याच्या ज्या बुरुजावर मांगीर बाबांची मूर्ती होती त्याचे काम सध्या पूर्णत्वास येत आहे म्हणून अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांना आम्ही अनेक दिवसांपासून फोन करून व भेटून मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करावी म्हणून मागणी करीत आहोत. मात्र मुख्याधिकारी मी बघतो असे सांगतात तर तत्कालीन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे पती साहेबराव पाटील हे तर फोन देखील उचलत नाहीत. दगडी दरवाज्यावरील त्या बुरुजाचे काम आता प्रगतीपथावर असून ते पूर्णत्वास येत आहे. आमच्या अस्मितेला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. मांगीर बाबा हे मातंग समाजाचे दैवत व अस्मिता आहेत. आमची अस्मिता मिटवण्याचा प्रयत्न कोणी केला तर आम्ही शांत राहणार नाहीत. येत्या 24 तासात म्हणजे 13 तारखेपर्यंत मांगीर बाबांच्या मूर्तीची स्थापना झाली नाही तर यापुढे आम्ही काम करू देणार नाहीत. काम बंद पाडू असा इशारा बहुजन रयत परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी प्रशासनाला दिला आहे. म्हणून आता तरी प्रशासनाने लक्ष घालून मांगीर बाबांच्या मूर्तीची स्थापना करावी अशी मागणी आता जनमानसातून होत आहे.