हतनुर धरणातुन तापीनदीत पाण्याचे एक आवर्तन मिळावे तालुकावासियांची आग्रही मागणी.


 चोपडा(प्रतिनिधी)* तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी प्रमुख नदी आहे. ही पश्चिम वाहिनी नदी भारताच्या मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतून वाहते. तापी नदीवर मुख्यत्वे उकाई धरण, काकरापार धरण, व हतनूर धरण बांधण्यात आलेले आहे.त्यापैकी हतनुर धरणातून तापी नदीत आमच्या हक्काचे व हिश्याचे एक पाणी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी चोपडा तालुकावासियांतर्फे गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
           तापी नदीत पाण्याचा प्रवाह अखंड वाहत राहिला पाहिजे,अशीही मागणी श्री.बाविस्कर यांनी याआधीच केलेली होती.कारण पावसाळा संपला की तापीत पाण्याचा प्रवाह खंडीत होऊन नदीचे पात्र कोरडेठाक होत असते.धरणाच्या वरिल भागात मुबलक पाणी असल्याने तो भाग सुजलाम सुफलाम होतो.व धरणाखालील भागात पाणी वाहत नसल्याने टंचाई निर्माण होत असते.यासाठी तालुकाभरांतुन ह्या मागणीला शेकडों लोकांनी दुजोरा दिलेला आहे.
         यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे तालुक्यातील कूपनलिका व विहिरींची पाण्याची पातळी खूपच खोल गेलेली आहे. त्यामुळे सध्या शेतात असलेली केळी, ऊस,पपई व इतर भाजीपाल्यांचे पिकांना पाणी अपूर्ण पडत आहे. तसेच पुढील काळात कापूस व इतर पिके लागवड करतांना सुद्धा पाण्याची गरज भासणार आहे. म्हणून हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचे एक आवर्तन सोडणे गरजेचे आहे. अशा आशयाचे निवेदन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील, पाणीपुरवठा व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जळगावचे जिल्हाधिकारीसाहेब, चोपड्याचे तहसीलदारसाहेब यांना देण्यात आलेले आहे. या निवेदनावर तालुकावासियांतर्फे चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक),आदर्श घुमावल बु.चे सरपंच वसंतराव पाटील, चोपडा राष्ट्रवादीचे माजी तालुकायुवाध्यक्ष दिपकराव सोनवणे(हातेड खुर्द), सामा. कार्यकर्ते मधुसूदन बाविस्कर, वैभवराज बाविस्कर(चोपडा) यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने